उपनिषदात म्हटले आहे, ' मातृवान पितृवान आचार्यवान पुरुषो वेद l ' ज्याला योग्य आई-बाप आणि गुरु मिळतात त्यालाच श्रेष्ठ ज्ञान प्राप्त होते. हे सदभाग्य फारच थोड्या लोकांना लाभते. अशांपैकी एक म्हणजे भगवान दत्तात्रेय. अत्रिऋषी व महासती अनसूया ह्यांचे ते पुत्र. ' अत्रि ' म्हणजे त्रिगुणातील आणि ' अनसूया ' म्हणजे असूया रहित. सत्व, रज व तम या तीन गुणात रममाण न होता तिन्ही गुणांना जो स्वेच्छेने खेळवू शकतो तो अत्रि आणि स्त्रीसुलभ असूयेला जिने स्वतःच्या जीवनात प्रवेशच दिलेला नाही अशा प्रकारचा जिवंत मनमोकळेपणा म्हणजे अनसूया. अशा आई-बापांच्या कुशीतच दत्तासारखा तेजस्वी पुत्र अवतरतो.
पुराणात कथा आहे, ब्रम्ह-विष्णु-महेश हे महासती अनसूयेच्या सतीत्वाची कसोटी पाहायला अत्रिऋषींच्या आश्रमात आले. त्यांनी अनसूयेला विवस्त्र होऊन भिक्षा वाढायला सांगितले. पतिव्रता स्त्रीला हे फार कठीण होते आणि भिक्षा दिली नाही तर अतिथी सत्कारात उणेपणा राहिला असता. महासती अनसूयेने स्वतःचे तप व सतीत्वाचा प्रभाव ह्यांच्या बळावर तीनही देवांना लहान बालके बनवली आणि त्या अडचणीतून मार्ग काढला. देव लज्जित झाले. देवपतन्यांच्या विनवणीवरून अनसूयेने त्यांचे पती त्यांना मूळ स्वरूपात परत केले. जाता जाता देवांनी आशीर्वाद दिला की, तू आम्हाला बालस्वरूप दिलेस. तू आमची आई बनलीस. आता आम्ही तिघेही संयुक्तरीत्या तुझ्या कुशीत जन्म घेऊ. देवांच्या ह्या आशीर्वादाने त्यांच्या संयुक्त अंश रूपात जन्मलेले बालक म्हणजेच दत्त.
उपरोक्त प्रसंगातील पौराणिकता वजा केली तर ब्रम्हा, विष्णु व महेश ह्यांच्यासारख्या तीन प्रभावी शक्ती बालसहज कुतुहलाने अत्रि व अनसूयेच्या आश्रमात चालत असलेली अविरत कर्मयोयाची धारा पाहण्यासाठी आल्या होत्या. अनसूयेने अतिशय मोकळ्या मनाने त्यांना आश्रमाची कार्यपरंपरा दाखविली. ते सर्व पाहून आश्चर्यचकित व प्रभावित झालेल्या देवांनी तेथेच राहायचे निश्चित केले. हेच कार्य महान आहे व स्वतःच्या शक्तीचा अंश ह्याच्यातच खर्च केला पाहिजे असे त्यांना वाटले. त्यांच्या ह्या भावनांचे जीवंत स्वरूप म्हणजे दत्त. शिवाय ह्याप्रमाणे समाजात प्रभुकार्य करू इच्छिणाराला समाजाच्या संपूर्ण परिस्थितीचे किंवा समस्यांचे स्पष्ट ज्ञान असले पाहिजे. त्याच्या दृष्टीने काही लपलेले असता कामा नये.
ईशकृपेने प्राप्त झालेल्या या बालकाला अत्रि ऋषीने प्रभुकार्यार्थ अर्पण केले. सांस्कृतिक कार्याला दिलेले, म्हणून त्यांचे नांव दत्त पडले. अत्रीचा पुत्र म्हणून तो आत्रेय. हे दोन्ही शब्द जोडून त्याला दत्तात्रेय म्हणू लागले, दत्ताचे स्वरूप संस्कृतीच्या महान कार्याचे प्रतीक आहे. कोणत्याही महान कार्याला साकार करण्याची तळमळीची इच्छा बाळगणाऱ्या कर्मवीराजवळ ब्रम्हा, विष्णु व महेश ह्यांची सर्जक, पोषक तशीच संहारक प्रतिभा असली पाहिजे. नित्य नूतन शक्ती, संपत्ती किंवा सदविचार ह्यांचा अविरत प्रवाह कार्यात वाहत राहिला नाही तर कार्याचे उत्कृष्ट सर्जन झाले असे मानले जात नाही.
नवे नवे विचार आणि प्रेरणा देण्याची तसेच नवे नवे प्रयोग करण्याची आगळी सर्जक प्रतिभा कार्यप्रमुखाजवळ असली पाहिजे. त्याचप्रमाणे कार्याचे नित्य पोषण होत राहावे यासाठी कार्यरत झालेल्या लोकांवर प्रेमाची पकड बसवणाऱ्या विष्णूचा प्रेमप्रवाह देखील त्याच्याजवळ वाहाता असला पाहिजे. विसर्जन व सर्जन मिळूनच श्रेष्ठ नवसर्जन होते. ह्या दृष्टीने पाहता शंकराची संहार-शक्ती देखील त्याने आत्मसात केली पाहिजे. सद्विचारांचे सर्जन, सदवृत्तीचे पोषण आणि दुर्गुण, दूरवृत्ती व दुर्विचार ह्यांचा संहार करण्याची त्रिमुखी प्रतिभा ज्याच्याकडे असते तोच महान कार्याचा प्रवर्तक बनू शकतो.
दत्तात्रेयाच्या हातात कमंडलू, माळा, शंख, चक्र, त्रिशूळ व डमरू आहे. ही सहा प्रतिकें देखील विशिष्ट अर्थांची सूचक आहेत. कमंडलू व माळा ब्रम्हाची आहे. शंख व चक्र विष्णूचे आहेत तर त्रिशूळ व डमरू भगवान शंकराचे आहेत.

ब्रम्हा हा निर्माता देव आहे. त्याच्या हातात कमंडलू व माळ आहे. कमंडलूमध्ये पाणी असते. पाणी म्हणजेच जीवन, आशा दृष्टीने पाहता, आपले प्रत्येक सर्जन प्राणवान झाले पाहिजे; मग ते मानवसर्जन असो, शिल्प-सर्जन असो, चित्र-कला असो, नृत्यकला असो, संगीतगायन असो किंवा साहित्य कृती असो.
कोणतीही निर्मिती प्राणवान केव्हा होते? जेव्हा तिच्या पाठीमागे भक्ती असते तेव्हा. माळ हे भक्तीचे प्रतीक आहे. कोणतीही कला भगवंताच्या चरणावर अर्पण झाली की, तिचा रंगच बदलून जातो. तिची प्रतिमा सोळा कलांनी फुलून उठते. कदाचित हीच गोष्ट लक्षात ठेवून भारतातील सर्वच कला मंदिरात म्हणजे भगवंताच्या चरण-कमलाजवळ विकास पावलेल्या आहेत. तुम्हाला भारतातील उत्कृष्ट शिल्पकला, चित्रकला, नृत्यकला किंवा संगीत-प्रवीणता पाहायची असेल तर भारतातील मंदिरांचीच मुलाखत घ्यावी लागेल.
विष्णु ही पोषण करणारी पालक देवता आहे. तिच्या हातात शंख व चक्र आहेत. शंख ध्वनि प्रेरक आहे आणि चक्र गतीसूचक आहे. कार्याचे पालन करू इच्छिणारा कार्यप्रमुख समग्र कार्यक्षेत्रात चक्राप्रमाणे फिरता असला पाहिजे. असाच शंखाप्रमाणे तेजस्वी विचारांचा उदघोष (द चा पाय) करून त्याने अन्य कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविला पाहिजे.
शंकर हा संहारक देव आहे. त्याच्या हातात त्रिशूळ व डमरू आहे. त्रिशूळ हे संहाराचे प्रतीक आहार तर डमरू हे संगीताचे प्रतीक आहे. संहार व संगीत स्वतःबरोबर बाळगणारा हा देव, महादेव गणला जातो. संहार किंवा मृत्यु ही काही भयंकर घटना नाही हे समजाविण्यासाठी भगवान शंकर स्मशानात राहतात. मृत्यु म्हणजे जीवाचे शिवाला भेटायला जाणे. भगवान शंकर डमरू हातात घेऊन संगीतासह सहर्ष सर्वांचे स्वागत करण्यासाठी उभे असतात. विसर्जन एक महान संस्था आहे. तिचे कार्य देखील महान आहे. जुने जाणे व नवे निर्माण होणे हीच संसारात असलेली प्रवाह-नित्यता आहे.
अशा प्रकारची आगळी प्रतिभा असलेल्या दत्तांनी स्वतःच्या जीवनात अनेक लोकांना गुरू समजून त्यांचे गुण घेतले आहेत. ही त्यांची अतुलनीय नम्रता आहे. स्वमताग्रहाऐवजी गुणाग्राही बनलेला माणूस अनेक लोकांच्या अनुभवांना आत्मसात करून महान कार्य उभे करू शकतो, हे दत्त आपल्या आचरणाने समजावत आहेत.
संपर्क : श्री. कुलदीप निकम
( Dattaprabodhinee Author )
भ्रमणध्वनी : +91 9619011227
( Whatsapp Or Sms Only )
( Whatsapp Or Sms Only )
ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...

Cure Problems With Divine Powers. 100s Of People Cured ! Chakra Healing balancing. Ancient Indian Science. Based on Ashtaang Yog. Learn Yogic Healing. Types: Learner's Workshops, Stress Management, Divine Karma Cleansing, Mind empowerment, Chakra Balancing. - Visit Website Here !
Embed दत्तप्रबोधिनी न्यास on Your Site: Copy and Paste the Code Below

0 Comments