रामनामव्रताचे वैशिष्ट्य काय ? या व्रतास अनुकूल काल कोणता ? Characteristic of Ramanamvrata


रामनवमी किंवा मकरसंक्रांतीच्यावेळी रामनामव्रत घेतात.  

वसिष्ठ रामायणात सांगितलेला बारा रामनामांचा क्रम पुढीलप्रमाणे आहे...

  • (१)  राम,  
  • (२)  श्रीराम,  
  • (३)  तुलसीत्रिभुवन राम,  
  • (४)  अहिल्योध्दारण राम,  
  • (५)  पतितपावन राम,  
  • (६)  जानकीजीवन राम,  
  • (७)  त्राटिकामर्दन राम,  
  • (८)  कौसल्यानंदन राम,  
  • (९)  सीतापते राम,  
  • (१०)  मारुतिदर्शन राम,  
  • (११)  दाशरथे राम,  
  • (१२) सीताशोधन राम.


व्रतग्रहणाचे दिवशी मंगलस्नान करून प्रातःकाली  पूजेचा संभार जमवून प्रारंभ करावा.  पूजेच्या साहित्यात नैवेद्यासाठी तिळाचा लाडू असावा.  पूजेसाठी रामाची मूर्ती,  प्रतिमा किंवा चित्र असावे.  षोडशोपचार पूजा,  अभिषेक केल्यावर आपला उजवा कान देवासमोर करून आपल्या कानात भगवान रामचंद्राने रामनाम उपदेश केला आहे अशी भावना करावी.  

दुसऱ्या वर्षी पहिले नाम विसर्जन करून पुढील नाम घ्यावे.  शेवटच्या बाराव्या वर्षांनंतर नाम विसर्जन करावे.  नवीन घेऊ नये.  बारा वर्षांनंतर आवडीचे रामनाम चालू ठेवण्याचा प्रघार आहे.  काही लोक बारा वर्षांनंतर रामनामाऐवजी आराध्यदेवतेचे किंवा गुरूचे नाम घेतात.


रामनाम घेतल्यावर दररोज किमान शंभर,  हजार  किंवा अधिक संख्येने त्या नामाचा जप जप करावा.  रामनामग्रहणविधीच्या संकल्पात 'खानपानादौ' असा उच्चार केलेला असल्यामुळे कोणताही पदार्थ तोंडात टाकण्यापूर्वी तसेच कोणत्याही पेयाचे पात्र मुखाला लावण्यापूर्वी ते ते रामनाम घ्यावे.  

आपल्या नामास् अन्य कोणी प्रतिसाद दिला तर ठीकच,  अन्यथा स्वतःच ते नाम दोनदा उच्चारावे.  रामनामाच्या जोडीला काही साधक एकवाढी (पहिल्यांदा वाढलेले अन्न ग्रहण करणे,  पुन्हा घेणे नाही),  मिश्रभोजन (सर्व पदार्थ एकत्र करून खाणे),  मौनभोजन (जेवताना न बोलणे),  इत्यादि नियम पाळतात.  त्यामुळे आरोग्य तर उत्कृष्ट राहतेच पण आवडीनिवडी,  अहंकार इत्यादि दोषांचे निर्मूलन झाल्यामुळे आश्चर्यकारक आध्यात्मिक प्रगती घडून येते.

रामनाम व्रताचा मुख्य उद्देश म्हणजे परान्न, अस्पृष्टान्न,  कुसंस्कृतान्न इत्यादि दोषयुक्त अन्नाचे सेवन घडले असल्यास तो दोष नष्ट होतो.  हल्लीच्या काळात तर सामाजिक परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की,  दोषयुक्त अन्न कितीही टाळले तरी काही वेळा दुसरा पर्याय रहात नाही.  अशा वेळी रामनाम व्रतासारखे दुसरे कोणतेही उत्कृष्ट फलदायी व्रत नाही.  

ज्यांना बारा वर्षांचे रामनामव्रत घेणे अशक्य वा असंभवनीय वाटत असेल त्यांनी बारा महिन्याचे रामनामव्रत रामनवमी दिवशी घ्यावे.  प्रत्येक महिन्याच्या शुद्ध नवमीला रामनाम बदलावे.

ह्या पोस्टशी संबंधित माहिती लिंक खालीलप्रमाणे...








Post a Comment

0 Comments

0